मी मृत आहे
नी निजलेला
जाणीव नसे ज्याला
आज दिवस कुठला।
रवी आहे उभा
काळ सरकत ठाई
काटे गोल का फिरतात
मज उमजत नाही।
किती समज कुणी
जरी पुढ्यात मांडिली
संवेदनेचा संवाद आता
पडद्यावर उमटत नाही।
पाउलांच्या आठवणी
ठश्यात विरुनी गेल्या
समुद्राच्या घडित
आता आवेग नाही।
अंतर किती आज
मी गाठीले आहे
मी आहे तोच जुना
हा प्रश्नच उरत नाही।
बाकी आहे काही
या भागाकारात सख्या
तुझ्या या शब्दानां मात्र
अर्थाची सावली नाही।
या अंधारात सारे
हरवून बसलो
आता चांदणीचा उजेड
मला भावत नाही।
ज्या नक्षत्रात
आपण कधी रमलो - हरपलो
आता तो मौसम परतणे
शक्य नाही।
जे होते भाग्यी
ते सारे जीवन जगलो
आता या रात्रीत नवीन
दिवस नाहीत।
No comments:
Post a Comment