कधी कधी शब्दांना
खंरच मी खूप त्रासतो,
भावनांचा आवेग
नी चहाचा कप,
कसा कागदावर मांडावा
या साठी भांडतो.
आपण जगतो
म्हणजे नेमंक काय करतो?
चार गोष्टी नी चार व्यक्ति
जपता येतील,
हाच एक प्रयत्न
कदाचित सदैव असतो.
पण हे आठवणींचे भांडवल
जरा नेहमीच विचित्र वागते,
नेमंक नको तेव्हा
टाचणी मनात टोचते,
अश्रु नसले तरी कसेसेच होते
अचानक पोटात एक गोळा देवून जाते.
मित्रा आपण किती
पोरके नी भटके झालोयेत,
दूर जगाच्या कोपरयात
जाऊन बसलोयेत;
तरी कुठली ती शिदोरी
जी अजुन पुरतेये?
हा प्रश्न जागा झाला की
एक गाणे गुंजते -
तुझी आठवण मज येते
तालात विलीन होते,
हरपुन माझे जीणे
कुणी हृदयात निनादते.
No comments:
Post a Comment